प्रक्रिया कि परिणाम

नोकऱ्या बदलण्याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या संस्थांमधून आणि तिथे असलेल्या बॉसकडून शिकायला मिळतं. मी नोकरी केलेल्या एका संस्थेमध्ये प्रक्रीयांवर भर दिला जायचा. त्यांचा असा ठाम विश्वास होता की जर प्रक्रीया आणि व्यवस्था निर्माण केल्या आणि त्यांचे काटेकोरपणे पालन केले तर परिणाम मिळतातच. मी काम करत असलेल्या दुसऱ्या एका संस्थेमध्ये कुठल्याही मार्गाने परिणाम मिळवण्यावर भर असायचा. असे परिणाम प्राप्त करण्यासाठी व्यवस्था मात्र विकसित केल्या नव्हत्या.

दोन्ही संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांवर ह्या व्यवस्थांचा किंवा अपेक्षित परिणामांचा ताण येत होता. पहिल्या संस्थेमध्ये जिथे प्रक्रीयांवर भर होता तिथे परिणाम दृष्टीपथात न राहण्याचा संभव असे. नियमबध्द पध्दतीने वागताना, जर आवश्यक अपेक्षित परिणाम बदलले तर त्यांना साध्य करण्यासाठी लोकांकडे फार कमी पर्याय असत. संस्थात्मक पातळीवर खुप कमी लवचिकता होती आणि बऱ्याचवेळा मठ्ठ पध्दतीने आदेश पाळण्यापलिकडे लोक काही करू शकत नसत. दुसऱ्या संस्थेमध्ये जिथे परिणाम महत्वाचे होते तिथे बऱ्याचवेळा असे लक्ष्य निश्चित केले जात असे कि ते साध्य करताना संस्थेमधल्या प्रक्रीया व व्यवस्था यांचा विचारच केला जात नसे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर माहिती व संपर्क ह्या दोन बाबतीत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असायची.

प्रक्रिया आणि परिणाम ह्यामध्ये असलेली हि द्विधा स्थिती माझ्या सध्याच्या दररोज एक लेख लिहिण्याच्या २१ दिवसाच्या चॅलेंजच्या संबंधात ताडून बघितली. सध्याच्या लॉकडाऊनच्या कालावधीतली स्वतःला कार्यशील आणि सर्जक पध्दतीने गुंतवून ठेवणारे हे एक साधे काम वाटू शकते. कसेही असले तरी त्यासाठी मला प्रक्रीया निश्चित करायला लागते आणि त्याचे परिणाम तपासून पहायला लागतात.

कंटाळवाण्या वाटणाऱ्या काही गोष्टी ह्यामध्ये कराव्या लागतात. कॉम्प्युटरमधल्या मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टायपिंगचा किमान वेग सांभाळावा लागतो. मला माहितीसाठी जो इंटरनेटचा वापर करावा लागतो त्यासाठी घरात चांगले मोबाईल नेटवर्क जिथे असेल तिथे फिरावे लागते. बरोबर किंवा चुक कसेही असतील तर विषयाबद्दल असलेले विचार सर्वप्रथम शब्दांकित करावे लागतात. कधीकधी जर लिखाण सुसंगत वाटत नसेल तर पूर्ण लेख खोडून पुन्हा लिहावा लागतो. कधी तुमचा मेंदू आणि शरीरही सहकार्य करत नाही. कधी झोप येऊ शकते तर कधी खाज. कधी माझ्या आजुबाजूच्या लोकांना नकार द्यायला लागतो आणि त्यात खेळायला बोलावणाऱ्या माझ्या मुलग्याचाही समावेश आहे. त्यामुळे अपराधी भावना निर्माण होऊ शकते.

त्याचवेळेला एका विशिष्ट प्रमाणात जरी अपेक्षित परिणाम मिळाले तरी यशस्वी झाल्यासारखे वाटत नाही. तुम्हाला तुमच्या लिखाणाच्या मर्यादा दिसू लागतात आणि असमाधानी वाटू लागतं. आधी विचार करून ठेवलेली विषयांची यादी संपली की पुढे काय लिहायचं ह्याची अनिश्चितता सतावू शकते कारण चॅलेंज तर घेतलेलं असतं. कधीकधी वाचकांचे सर्व छान छान अभिप्रायसुध्दा चिंताजनक वाटू शकतात. मेसेजमध्ये लेख पोचल्यावर काही क्षणात उत्तर म्हणून पाठवली जाणारी थंब्स अपची इमोजी पाहिल्यावर प्राप्तकर्त्याने आपला लेख वाचला तरी आहे का अशी शंका येते.

हे एक चक्र आहे. तुमच्याकडे काय आहे ह्यावर आधारीत तुम्ही विचार करता. अपेक्षित परिणाम मिळावे म्हणून तुम्ही त्या दिशेने काम करू लागता. परिणाम साध्य करण्यासाठी तुमच्या प्रक्रीया त्यानुरूप बनवता. त्या प्रक्रियांनुसार काम करू लागता. त्याचवेळेस साध्य झालेली परिणामांची प्रगती मापून पाहू लागता. जर परिणाम साध्य करण्यास प्रक्रीया मदत करत असतील तर त्याबरहुकुम काम करणे श्रेयस्कर असते. पण जर असे कळून चुकले की असलेल्या प्रक्रीया परिणाम साध्य करण्यासाठी मदत करत नाहीत तर त्या बदलणे आवश्यक असते.

वैयक्तिक आयुष्यात तुमचे ध्येय किंवा दिशा हे अपेक्षित परिणाम असतात. तुमच्या सवयी ह्या तुम्हाला त्या दिशेकडे घेऊन जाणाऱ्या प्रक्रीया असतात. काही लोक म्हणतात की चांगल्या सवयी निर्माण करा आणि तुम्ही विनासायास योग्य दिशेला जाल. पण जर ती योग्य दिशा माहीत नसली तर सवयी तुम्हाला आहे त्या जागेवर ठेवू शकतात मग ती जागा चांगली असो की वाईट.

जर हा लेख तुम्हाला फार बोरींग वाटला असला तरी तुम्ही त्याबाबतीत काही करू शकत नाही कारण तो वाचून पूर्ण झालाय.
---------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

A Psycho-financial Experiment

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी