एक आर्थिक-मानसिक प्रयोग
शेतकरी आत्महत्या हा मुद्दा सध्या सतत इतका चर्चिला जातो की लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरूवात केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी साधारण सरासरी १३,५०० शेतकरी आत्महत्या करतात. जर तुलनात्मक विचार करायचा झाला तर आतापर्यंतची २००४ पासूनची सर्वात मोठी आपत्ती म्हणजे उत्तराखंडचे पूर ज्याच्यामध्ये त्यापेक्षा कमी म्हणजे ४००० लोक मरण पावले होते. माझ्या विदर्भामधल्या शेतीविषयक प्रकल्पांमधील कामामुळे शेतकरी आत्महत्या हा विषय जवळून व थेट समजून घेण्याची संधी मिळाली. मानसशास्त्रातील संशोधनानुसार हे सिध्द झाले आहे की आत्महत्येच्या निर्णयाप्रति पोचण्याआधी त्या व्यक्तीमध्ये मानसिक ताणतणाव टोकाला पोचलेले असतात. माझ्या शेतकऱ्यांच्या चर्चांमध्ये हे मुद्दे येत असत. निव्वळ पावसावर आधारीत शेतीवर पूर्ण अवलंबित्व, आणि त्या पिकांमधून वर्षातुन एकदाच मिळणारे घाऊक उत्पन्न ह्याबद्दल ते प्रकर्षाने बोलत असत. अन्य आर्थिक उत्पन्नाचे स्रोत त्यांच्याकडे नसत आणि उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असत. जे उत्पन्न होते ते असुरक्षित आणि अशाश्वत होते. त्यामुळे त्यांच्या जीवनात प्रचंड ताण निर्माण होत होता. काही वर्षांनी मी...