ग्रामीण भागातील कचरा समस्या- ६
मावलिन्नॉंग हे मेघालय राज्यातील एक साधारण ५०० लोकवस्ती असलेलं गाव आहे. डोंगराळ भाग आणि सुपारीच्या बागा असं कोकणासारखंच वातावरण असलेल्या ह्या गावात ३० वर्षांपुर्वी काविळीची साथ आली आणि काही गावकऱ्यांचा त्यात मृत्यूही झाला. ह्या घटनेनंतर गावकऱ्यांनी गाव पुर्णतः स्वच्छ करण्याचा वसा घेतला तो कायमचा. गावकऱ्यांनी त्यांच्या सवयी कायमच्या बदलून टाकल्या आहेत. गावात कुठेही उघड्यावर सार्वजनिक जागी कचरा टाकण्यास बंदी आहे. प्लास्टिकचा कोरडा कचरा रस्त्यावर विवक्षित ठिकाणी ठेवलेल्या बांबूच्या कुंड्यांमध्ये जमा केला जातो. घरांच्या आसपासचा पन्नास मीटरपर्यंतचा परिसर गावकरी नियमीत स्वेच्छेने साफ करतात व प्रत्येक घराच्या समोर एक सुंदर बाग केलेली असते. आज हे गाव आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाते आणि अनेक पर्यटक फार दुरून येथे येतात. बऱ्याच घरांमध्ये होमस्टे व घरगुती खानावळी सुरू झाल्या आहेत. पर्यटकांकडूनही गाव स्वच्छ राखले जाईल ह्याची काळजी गावकरी घेतात. आज ह्या स्वच्छतेचा फायदा चांगल्या आरोग्याबरोबर पर्यटनाद्वारे स्थानिक रोजगारनिर्मितीमध्ये झाला आहे. अजुन एक विशेष उदाहरण क...