कोकणी खाद्यकथा- २

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेतोरे नावाचे एक गाव आहे. तिथल्या एका मंगल कार्यालयात जेवणाची पंगत बसली होती. मालकांच्या नातेवाईकांचा एक मुलगा सुट्टीत त्यांच्याकडे आला होता. जेवणात त्या भागात प्रचंड लोकप्रिय असलेली वाटाण्याची रस्सेदार उसळ होती. पंगतीमधले सर्वजण भात आणि उसळ परत परत मागून घेत होते. हा मुलगा उत्साहाने आपल्या काकांच्या मदतीला गेला आणि उसळ वाढायला लागला.

“ए! माका वाईच रस्सो दी.” एकाने त्याला जोरात हाक मारून बोलावले. चविष्ट रस्सा आणि वाफाळता भात मस्त लागतोय ह्याचा त्याला साक्षात्कार झाला होता. त्याचं बघून शेजाऱ्याने तसेच केले. समोरचे रस्सा ओरपत आहेत हे बघून विरुध्द रांगेतले लोकही त्याला बोलवू लागले. प्रत्येकाने फक्त रस्साच घेतल्यामुळे शेवटी पातेल्यात वाटाणेच शिल्लक राहिले. तो छोटा मुलगा चिडला आणि जोरात ओरडला, “हो चोथो कोन खातलो?” सगळेजण अवाक झाले. त्याचे काका लगबगीने पंगतीजवळ गेले. “राग मानू नाका हां. ल्हान आसा.” असं सांगून त्यांनी सावरून घेतलं. लोकांना त्याची मजा वाटली. पण त्याचं वाक्य मात्र लक्षात राहिलं.

आता जेवताना रस्साच खाल्ला आणि त्यातली डाळ, भाज्या तश्याच राहिल्या किंवा कुठल्याही मिश्रणातल्या फक्त आवडत्या वस्तू वेचून घेतल्या तरी खरडपट्टी काढताना म्हणतात, “चोथो कोन खातलो?” इकडच्या मुली लग्न झाल्यावर सासरी हा वाक्प्रचारही बरोबर घेऊन जातात. मग त्यांच्या मुलांना, नवऱ्यांना आणि पाहुण्यांनाही त्याची सवय होउन जाते. तेसुद्धा म्हणतात, “चोथो कोन खातलो?”.
-------------------------------------

Comments

Popular posts from this blog

A Psycho-financial Experiment

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी